शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शंभर टक्के अहवाल आल्यावरच शाळांची घंटी वाजणार
शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शंभर टक्के अहवाल आल्यावरच शाळांची घंटी वाजणार
हिंगोली, ता. २२ : जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग तसेच वसतीगृह व आश्रमशाळा सोमवार ता. २३ पासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे . मात्र जिल्ह्यात शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे संपूर्ण अहवाल आले नसल्याने तुर्तास शाळेची घंटा वाजणार नाही.
दरम्यान याबाबत रविवारी ता. २२ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी व पालकांची व्हिडीओ काँन्फरंसद्वारे बैठक घेतली. या बैठकीत शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणी संदर्भात चर्चा झाली. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांच्या कोरोना चाचणी सुरु आहेत.
आतापर्यंत जवळपास २७७२ शिक्षकांनी स्वॅब नमुने दिले असून त्यातील आठ ते दहा जण बाधीत निघाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. उर्वरित शिक्षकांच्या अहवाल येणे बाकी आहे यामुळे सर्व शिक्षकांचे अहवाल आल्यावरच शाळा सुरू करण्या बाबत चर्चा झाली तसेच लोकप्रतिनिधी व बहुतांश पालकांनी देखील शाळा सुरु करण्यास नकार दिल्याचे श्री. शेंगुलवार यांनी सांगितले. त्यामुळे तुर्तास सोमवार पासून शाळा सुरु होण्यास अडचणी आल्याने आज वाजणारी शाळेची घंटा पुढील निर्णयापर्यंत लांबणीवर पडली आहे.
शिक्षकांचे कोराना चाचणीचे अहवाल बाकी आहेत तसेच लोकप्रतिनिधी व पालकांनी नकार दिल्याने शाळा सुरू होणार नाहीत.
अनुप शेंगुलवार
प्रभारी सीईओ जिल्हा परिषद
जिल्ह्यातील शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल अद्याप बाकी आहेत. शंभर टक्के अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
रुचेश जयवंशी
जिल्हाधिकारी हिंगोली