जिल्हा परिषदेत दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुन्हा खळबळ
जिल्हा परिषदेत दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुन्हा खळबळ
हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या अर्थ व महिला बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.
येथील जिल्हा परिषदेचे अर्थ विभागातील कर्मचारी बालाजी बांगर व महिला व बालकल्याण विभागातील कक्ष अधिकारी डी. एस. जाधव यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हे दोन्ही विभाग आरोग्य विभागाच्या वतीने शील केले असून, कर्मचाऱ्यांना घरी पाठवून दिले आहे. तर या दोघांना सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारसाठी भरती करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
या दोन्ही कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने खाली उतरवून कार्यालयात सानिटाईझ फवारणी करण्यात आली. तर मंगळवारी अकरा वाजता अर्थ, व महिला बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी केली जाणार आहे.
महिला बालकल्याण विभागातील कक्ष अधिकारी डी. एस. जाधव हे( ता.२०)ऑगस्ट पासून औरंगाबाद येथे गेले होते. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात आले असता त्यांना त्रास होऊ लागल्याने ते व युवराज देशमुख यांची तपासणी केली असता जाधव यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर युवराज देशमुख यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.अगोदरच जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कार्यालय तीन दिवस बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतरही विभाग प्रमुखांना होम क्वारंटाईन केल्यानंतर जिल्हा परिषदेचे कामकाज आठ दिवस ठप्प झाले होते. त्यानंतर दोन आठवड्या पासून कामकाज सुरळीत सुरु असताना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.