राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
हिंगोली - जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये सादर न केल्याचा ठपका ठेवत आंबा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडूण आलेले राजेंद्र देशमुख यांची जि. प. सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करून त्यांना सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
सन २०१७ मध्ये आंबा जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सदर गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होता. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र देशमुख रा. सेलू यांनी आंबा येथील शिल्पा श्रीनिवास भोसले यांचा पराभव करून विजय मिळविला होता. दरम्यान, राजेंद्र देशमुख यांचे जात प्रमाणपत्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढलेले असून त्यांच्याकडे जातीचे ठोस पुरावे नसल्याची लेखी तक्रार शिल्पा भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते नदाफ म. बशीर खान यांनीही जिल्हा परिषद सदस्य देशमुख यांची निवड रद्द करण्याची मागणी केली. या प्रकरणी नदाफ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याप्रकरणात जवळपास चार वेळा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. परंतु, वारंवार गैरअर्जदार देशमुख यांनी मुदत वाढवून मागितली. याप्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्याकडून २१ आॅगस्ट २०१८ रोजी राजेंद्र देशमुख यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द करण्याचे आदेश पारीत केले होते. या निर्णयावर देशमुख यांनी चार आॅक्टोंबर २०१८ रोजी उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली होती. परंतु, आजपर्यंत सदर प्रकरणी उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या आदेशास स्थगिती दिली नाही. त्यामुळे अर्जदार बशीर खान यांचा अर्ज मान्य करून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधीत प्रकरणातील गैरअर्जदार राजेंद्र देशमुख यांची आंबा गट क्रमांक ४४ मधून जि. प. सदस्य म्हणून झालेली निवड महाराष्ट्र नियमाप्रमाणे रद्द केले आहे.
चौकटीचा मजकूर
---------------------
मतदार व शासनाची फसवणूक करून जातीचे ठोस पुरावे नसताना राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द होणे म्हणजे हा लोकशाहीचा विजय आहे़. याप्रकरणात वर्षभरातच निकाल लागणे अपेक्षीत होते़ परंतु, शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि तो आज झाला़.
शिल्पा भोसले
पराभूत उमेदवार
-----------
मी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केलेली असून त्याचा निकाल ३१ ऑगस्टला आहे.निकाल काय येतो त्याकडे माझे लक्ष आहे.
राजेंद्र देशमुख
जिल्हा परिषद सदस्य