जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोरोनाची जनजागृती
हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोना जनजागृती करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून भिंतीवर कोरोनाच्या म्हणी लिहीत जनजागृती केली जात आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना केल्या जात असताना, आता जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा,पशु संवर्धन उपयुक्त डॉ. लक्ष्मण पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण कुमार घुले यांनी देखील कोरोना बाबत जनजागृती साठी उडी घेतली असून पशु वैद्यकीय दवाखाण्याच्या भिंतीवर चक्क म्हणीचा वापर केला आहे.
औंढा तालुक्यातील येहेळगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या गावात डॉक्टरांनी बोलक्या भिंती बनवल्या. गावातील भीतींवर कोरोनापासून काळजी घ्या, भाजीपाला स्वछ धुवून घेणे अश्या प्रकारच्या म्हणी लिहून नागरिकांत जनजागृती केली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने येहेळगाव येथील भिंतीवर जनजागृतीसाठी म्हणी लिहिण्यात आल्या कोरोनाचा समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे हे रॅपिड अँटीजेन टेस्टमधून आता स्पष्ट होत आहे. एकाच भागात एकाचवेळी २०ते २५ रूग्ण आढळून येत असल्याने, सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजूनही अनेकजण कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आढळलेल्या भागात आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती फलक लावले जात आहेत. सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत कोरोनाबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवल्यास त्यांना लवकर समजेल, असा विचार प्रशासनाने केला आहे.