हिंगोली : राहोलीत शेतकऱ्यांची आत्महत्या
राहोलीत शेतकऱ्यांची आत्महत्या
हिंगोली,- तालुक्यातील राहोली बुद्रुक येथील एका शेतकऱ्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली असून या बाबत अकस्मात म्रुत्युची नोंद झाली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील राहोली बुद्रुक येथील विठ्ठल बाबाराव डोरले (वय 40) यांना मालकीची एक एकर शेती असून, एवढ्यावरच कुटुंबाचा गाडा हकने शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी गावातीलच एका व्यक्तीची पाच एकर जमीन बटईने केली. यंदा वेळेतच पाऊस सुरु झाल्याने, खरीप पेरणीचा हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा त्यांना होती.मृग नक्षेत्रात पेरणी आटोपली मात्र बियाणांची उगवणच झाली नाही.
त्यामुळे कशी बसी उसनवारी करून, दुसऱ्या वेळेस ही पेरणी केली तरीही उगवण झालीच नाही.शेतकऱ्याने हार न मानता तिसऱ्यांदा पेरणी केली. मात्र, त्याही बियाण्याची उगवण झालेली नसल्याने, शेतकरी डोरले चांगलेच गोंधळून गेले. मागील काही दिवसांपासून शेतकरी डोरले हे अस्वस्थ होते. अखेर त्यानी घराच्या बाजूला असलेल्या पडक्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डोरले हे घरात न दिसल्याने कुटुंबायांनी त्यांचा बराच शोध घेतला असता पडक्या घरात त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.