शासन निर्देशानुसार आता ई-पासची सेवा राहणार नाही
शासन निर्देशानुसार आता ई-पासची सेवा राहणार नाही
हिंगोली - जिल्ह्यासह परराज्यात अत्यावश्यक व वैद्यकिय कारणासाठी अडकून पडलेल्या व्यक्ती, मजुरांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनातर्फे ई-पासची व्यवस्था करण्यात आली होती. पंरतू आता शासन निर्देशानुसार आता ही सेवा राहणार नसल्याचे निर्देश प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यासाठी दिलेल्या अटीनुसार परवानगी देण्यात येणार आहे. प्रवास करताना दोनचाकी वाहन केवळ एक व्यक्तीसाठी (चालक), तीन चाकी वाहने एक अधिक दोन व्यक्तीसाठी (चालक अधिक दोन) यानुसार प्रवास करण्यास परवागी असेल परंतू सर्व प्रवासी व चालकांचे वैद्यकिय तपासणी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यकतेनुसार चेक पोष्टवर हजर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना दाखविणे बंधनकारक असेल.
चेकपोष्टवरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची थर्मलगणद्वारे तपासणी करावी तसेच प्रवाशांची माहिती यात नाव, प्रवासी संख्या कोठून आले कोठे जायचे अशी माहिती नोंदवहीत घ्यावी ही माहिती आरोग्य व संबधीत विभागाला कळवावी, वाहनात व इतर ठिकाणी असताना सामाजीक अंतर राखणे बंधनकारक आहे. ताप सर्दी खोकला सदृश्य लक्षणे असलेले नागरीक 65 वर्षावरील नागरीक, गंभीर आजार असलेले नागरीक, दहा वर्षाखालील मुले व गरोदर माता यांनी अत्यावश्यक व वैद्यकिय कारणाशिवाय प्रवास करणे टाळावे.
कंटेनमेंट झोन मधील नागरीक यांना सदर आदेश लागू होणार नाहीत व त्यांनी आदेशाचे उल्लंघन करून प्रवास केल्याचे निदर्शनास आल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. जयवंशी यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.