सारीनेच झाला त्या व्यक्तीचा मृत्यू हिंगोलीकरांनी सोडला सुटकेचा श्वास
सारीनेच झाला त्या व्यक्तीचा मृत्यू हिंगोलीकरांनी सोडला सुटकेचा श्वास
हिंगोली- महिना भरापूर्वी मुंबईवरून हिंगोली जिल्ह्यातील एकांबा येथे आपल्या गावी पोहोचलेल्या व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोना नसून सारी या आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले होते. तसेच त्या रुग्णासह त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा आज कोरोना अहवाल हा निगेटिव्ह प्राप्त झाल्याने, हिंगोलीकरांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्यपथक व पोलीस प्रशासनाने एकांबा येथे भेट देऊन मयताच्या शेजाऱ्यांची नोंद घेतलेली होती. कधी नव्हे ते पथक वारंवार गावात येत असल्याने, सर्वांचेच लक्ष अहवालाकडे लागले होते. जिल्ह्यातील एकांबा येथील व्यक्ती हा मुंबई येथे मंत्रालयात कार्यरत आहे. कोरोनामुळे मनुष्यबळ कमी केल्याने तो आपल्या मूळगावी परतला होता. तो आला तेव्हापासून घरातच अलगिकरण कक्षात राहत होता. मात्र दोन दिवसांपासून अचानक ताप येत असल्याने, तो खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तेथे उपचार घेतल्यानंतरही ताप काही केल्या कमी होत नसल्याने, सदरील व्यक्ती हा जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेला असता, डॉक्टराने तपासून उपचारासाठी दाखल करून घेतले. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला होता. तात्काळ त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांना आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल करीत मयतासह नातेवाइकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. तो अहवाल आज निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे. मयत ज्या ठिकाणी काम करीत होता तेथून देखील त्याच्या आहवालाची प्रतीक्षा करीत होते. निगेटिव्ह अहवालामुळे परिसरातील ग्रामस्थानी देखील सुटकेचा श्वास सोडला आहे.