जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर तोबा गर्दी जमाव बंदीचे होते उल्लंघन
जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर तोबा गर्दी
जमाव बंदीचे होते उल्लंघन
हिंगोली - राज्य शासनाने कोरोना बाबत जिल्हाभरात जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच आजपासून संचार बंदीचे आदेश काढल्याने पेट्रोल पंपावर गर्दी होत असल्याने चक्क जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे पाहावयास मिळत होते.
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी,जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या वतीने उपाय योजना राबविण्यात येत आहेत.कोरोना व्हायरस बाबत खबरदारी म्हणून रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात आला. त्यापूर्वी शनिवारी देखील रंगीत तालीम म्हणून बंद पाळण्यात आला होता.जमाव बंदी नागरिकांकडून पाळल्या जात नसल्याने सोमवारी मध्यरात्री पासून राज्य शासनाने संचार बंदी लागू केली आहे.त्यामुळे तरी कोरोनावर मात करता येईल.जिल्ह्यात आतापर्यंत आठ कोरोना संशयित रुग्ण आढळून आले मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकारा सोडला.आता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या दृष्टीने खबरदारी म्हणून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे सांगितले जात असतानाही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करीत आहेत. त्यामुळे शासनाला संचार बंदीचे आदेश काढावे लागले.
सोमवारी जिल्हाभरातील पेट्रोल पंप रात्री बारा नंतर बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी हिंगोली सह, कळमनुरी, वसमत, सेनगाव, पुसेगाव, औंढा, आदी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे दिसून आल्याने जमाव बंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याने काही पेट्रोल पंपावर पोलिसांनी येऊन लाठीचार्ज केला आहे. गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पेट्रोल मालकाला पेट्रोल बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे काही नागरिकांना पेट्रोल न मिळताच आल्या पावली हात हलवत परतावे लागल्याची वेळ आल्याचे दिसून आले.