कोरोना विषाणुच्या अशास्त्रीय अफवाकडे दुर्लक्ष करा जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन
कोरोना विषाणुच्या अशास्त्रीय अफवाकडे दुर्लक्ष करा
जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन
हिंगोली - चीन व जगातील इतर देशांमध्ये नोव्हेल कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. हा सांसर्गिक आजार असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. तथापि कुक्कुट पक्ष्यांकडून मानवामध्ये हा आजार संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. या बाबत सोशल मीडीयावर पसरत असलेल्या अशास्त्रीय अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
मांस व मांस उत्पादने ही उकळवून व शिजवून सेवन केल्या जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. राज्यात कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केल्या जात असून या व्यवसायाशी अनेक शेतकऱ्यांचे चरितार्थ व आर्थिक हित जोडलेले आहे, पर्यायाने हा व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. खोट्या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय हा आर्थिक संकटात सापडला असून या व्यवसायाशी निगडीत लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया, फेसबुक व व्हॉट्सॲप द्वारे भारतात व महाराष्ट्रात कुक्कुट मांस व अंडी यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत. कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नसून ते मानवीय आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अशास्त्रीय अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी व पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.