रविवारी जनता कर्फ्यूचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली, दि. 21: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार, 22 मार्च रोजी अत्यावश्यक सेवा वगळता देशाभरात जनता कर्फ्यू घोषित केला आहे. यामध्ये नागरिकांना सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत स्वत:हून संचारबंदी पाळावी असे आवाहन केले आहे. याकरीता शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशभरातील पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळवा.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला शनिवार, दि. 21 रोजी जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसारच पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूचे आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याकरीता नागरिकांनी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीत घराबाहेर न पडता स्वत:हून संचारबंदी पाळून कोरोना विषाणू विरुध्द लढा देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे