तेरा वर्षानंतर औसा येथे होणार आमसभा जनतेचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा -राजेंद्र मोरे
जनतेचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा -राजेंद्र मोरे
औसा/ प्रतिनिधी: जवळपास 13 वर्षांच्या कालखंडानंतर आमदारांच्या उपस्थितीत औसा येथे आमसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली असून तालुक्यातील जनतेने या सभेस उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवून घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे यांनी केले आहे.
राजेंद्र मोरे यांनी म्हटले आहे की, बारा-तेरा वर्षांपूर्वी दिनकरराव माने आमदार असताना औसा येथे आमसभा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांच्या कार्यकाळात बसवराज पाटील यांनी एकही आमसभा घेतली नाही . आ .अभिमन्यू पवार यांनी मात्र आमसभेसाठी पुढाकार घेतला असून बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ही सभा होणार आहे. आ. धीरज देशमुख हे देखील या सभेस उपस्थित राहणार आहेत .
तालुक्यातील नागरिकांना विविध अडचणी आहेत .त्यावर या सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले ,विहीरी यासह ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते या संदर्भात प्रश्न आहेत.तालुक्यात निराधार आणि अपंगांचेही प्रश्न आहेत. अनेक निराधारांनी अर्ज दाखल केलेले आहेत . अनेक दाखल करत आहेत . जवळपास २ हजार निराधार व अपंगांना या सभेच्या माध्यमातून आधार मिळण्याची शक्यता आहे .या सभेत लोकप्रतिनिधींसमोर प्रश्नांची मांडणी करता येणार आहे.त्यामुळे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिप व पंचायत समित्यांचे सदस्य यासह सामान्य जनतेने या आमसभेस उपस्थित रहावे ,असे आवाहन मोरे यांनी केले आहे.